औरंगाबाद : पुलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश केले लागू
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी या करिता पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये खालील प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्याचे जवळपास कोणत्या ही व्यक्तीस शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही.
कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकायची साधने बाळगू नये, जमा करुन नये किंवा तयार करता येणार नाही, कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही, जाहीरपणे घोषणा करु नये, गाणे किंवा त्यांचे ध्वनिमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनिक्षेपण करुन नये.
अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करु नये, सोंग अगर हावभाव करु नये, आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तु तयार करु नये, त्याचे प्रदर्शन करु नये किंवा त्यांचा जनतेस प्रसार करता येणार नाही.
तसेच आणखी असे ही आदेशीत करीत आहे की, संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्यीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागु होणार नाही.
सदरचा आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दि.29 जून 2021 चे 00.01 वाजे पासून ते दि.13 जुलै 2021 चे 24.00 वाजेपावेतो लागु राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाईस पात्र राहील असे पोलीस आयुक्त श्री.गुप्ता यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
0 Response to "औरंगाबाद : पुलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश केले लागू"
टिप्पणी पोस्ट करा